कन्यादान-सप्तपदी शिवाय वैवाहिक संबंधांना मान्यता नाही
कन्यादान-सप्तपदी शिवाय
वैवाहिक संबंधांना मान्यता नाही!
कन्यादान-सप्तपदी हा हिन्दू विवाह पध्दतीमधील सर्वात महत्वाचा विधी आहे. हा विधी पूर्ण न केल्यास एखादा विवाह पूर्ण होत नाही. त्यामुळे या विधीशिवाय असलेली नाती आणि समाज मंदीरांमधून मिळविलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र ‘अवैध’ आहेत असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नुकताच दिला आहे. त्यामुळे नाशिक आणि पंढरपूरहून विवाहाचे नोंदणी प्रमाणपत्र आणणार्यांना ‘चपराक’ बसली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानांची क्रांती घराघरात पोहोचली आहे. किंबहुना लहानांपासून तर वृध्दांच्या हातापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे माहितीचा ‘स्फोट’ झाला आहे. जग ‘ग्लोबल खेडे’ झालेले आहे. शिक्षण क्षेत्रात ‘क्रांती’ झालेली आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत चार भींतीच्या ‘आड’ ही संकल्पना ‘कालबाह्य’ ठरली आहे. मुली आता घराबाहेर पडल्या आहेत. उच्च शिक्षण घेवून मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. देशातील सर्वच क्षेत्रात महिला यशस्वीपणे काम करतांना दिसत आहेत.
यशस्वी इंजिनिअर, डॉक्टर, संशोधक, पायलट, रेल्वे चालक, ट्रक ड्रायव्हर, लेखक, साहित्यिक, उद्योजक, शेतकर्यापासून तर भारतीय सैन्यात यशस्वी युध्द विमान चालक पदापर्यंत महिला पुरूषांनाही लाजवेल अशा पध्दतीने काम करतांना दिसत आहेत. त्यामुळे आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे दिसत नाहीत. दुसरी बाजू महिलांच्या संदर्भात असते ती एक गृहिणी म्हणून, माता-जननी, कुटूंबावर संस्कार करणारी एक ‘आई’ म्हणून तिची भूमिका महत्वाची ठरते. देशाचा ‘आदर्श’ नागरिक घडविणारी आणि कुटूंबातील आपल्या मुलांवर ‘संस्कार’ करणारी अशा कितीतरी ‘भूमिका’ तिला पार पाडाव्या लागतात, त्यात ती यशस्वी देखील ठरते. भारतीय हिन्दू संस्कृतीत ज्या घरामध्ये मुलगी जन्म घेते त्या घरात ‘लक्ष्मी’ आली असे मानले जाते.

नव्वदच्या दशकापर्यंत शिक्षणाची क्रांती होण्याआधी मुलींना 10, 11, 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले की तिचा विवाह करण्याची जबाबदारी आई-वडील, आजेाबा, मामा पार पाडत असत. मुलीसाठी एक अनुरूप वर शोधण्याची जबाबदारी देखील आई-वडिलांचीच असते, आजही आहे. वराची निवड झाली की विवाह तिथी शोधून दोघांचा विवाह सोहळा, भारतीय हिंदू संस्कृतीत जो 16 संस्कारांपैकी एक मानला जातो तो पार पाडला जातो. आप्तेष्ट, नातेवाईकांच्या उपस्थितीतीत आणि पंडितांच्या मंत्रोच्चारात हा विधी पार पडतो. ज्यामध्ये ‘कन्यादान’ आणि ‘सप्तपदी’ हा सर्वात महत्वाचा आणि हिन्दू संस्कृतीतला महत्वपूर्ण विधी पार पडतो. कन्यादान करतांना आई-वडिलांसह कुटूंबातील काका, बाबा देखील या विधीत सहभागी होतात. अलीकडच्या काळात काही विचार स्वातंत्र्यात जगणार्या महिलांना प्राचीन काळापासून चालत आलेल्या कन्यादान या संस्कारांवर देखील आक्षेप आहे.
यानंतर अत्यंत महत्वाचा विधी मानला जातो तो म्हणजे सप्तपदीचा. हिन्दू धार्मिक परंपरेतील संस्कार आणि सांसारिक जीवनाची सूत्रे सांगणारा हा विधी ‘अग्नीकुंडा’च्या साक्षीने सात फेरे घेवून पार पाडला जातो. आणि या विवाह सोहळ्याला धार्मिक मान्यतेसह समाज मान्यता दिली जाते. त्यानंतर नव विवाहित दाम्पत्य आपल्या सांसारिक जीवनाला सुरूवात करतात. परंतू अलिकडच्या काळात प्रेमविवाहाच्या नावाखाली धर्मशाळेतून किंवा समाज मंदिरातून विवाहाचे प्रमाणपत्र मिळविण्याचा ‘नवा’ प्रकार सुरू झाला आहे. नाशिक आणि पंढरपूर या ठिकाणाहून अशाप्रकारचे ‘विवाह प्रमाणपत्र’ आणून ते पोलिसांसमोर सादर केले जातात. परंतू या प्रमाणपत्रांना सर्वोच्च न्यायालयाने डॉलीराणी विरूध्द मनीषकुमार या प्रकरणात अशा प्रकारची प्रमाणपत्रे विवाहाचा पुरावा ठरूच शकत नाही अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे.
समाज मंदीर किंवा धर्मशाळेतून मिळविलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र ‘अवैध’ ठरविण्यात आले आहेत. भंडारा येथील न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणात नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती अनिल किलोरे आणि आणि न्या. प्रविण पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत कौटूंबिक न्यायालयाने दिलेला निकाल अयोग्य ठरवत सदर प्रकरण पुन्हा भंडारा न्यायालयाकडे वर्ग केले आहे. प्रश्न केवळ या प्रकरणाचा नसून संपूर्ण समाज व्यवस्थेचा आहे. मुली भावनिक होवून किंवा कुणाच्याही ‘मोहाला’ बळी पडून, पळून जावून विवाह करतात आणि अशा विवाहांना कुटूंबातून विरोध झालेला असतो. तो समाज प्रतिष्ठेचा विषय असल्याने अशा विवाहांना आई-वडील, भाऊ, समाज मान्यता देत नाहीत. मागील 15 दिवसांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या आपल्या मुलीला सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याने चोपडा येथे रिव्हॉल्व्हरची गोळी झाडून ठार मारले.
विवाहाला दोन वर्ष झालेली असतांना वडिलांच्या मनातून ती ‘सल’ गेलेली नव्हती. अल्पवयात विवाह करणे म्हणजे 18 वर्षांपूर्वी लग्न करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. असे विवाह देखील होतांना दिसत आहेत. तर शिक्षणाच्या नावाखाली मुंलीचे लग्नाचे वय निघून जाते, तोपर्यंत पालक चांगल्या वराच्या शोधात विवाह ‘बाजारात’ फिरतांना दिसत आहेत. तर अनेक मुली करीअरच्या नावाखाली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहतात आणि आयुष्याचे ‘वाटोळे’ करून घेतात. त्यामुळे विवाह संस्थेला नाकारणे हे देशाच्या न्यायसंस्थेला सुध्दा मान्य नाही. त्यामुळे पळून जावून विवाह करण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांच्या संमतीने मुला-मुलींनी विवाह करणे आणि भारतीय हिन्दू विवाह संस्थेच्या 16 संस्कारांपैकी एक असलेल्या विवाह पध्दतीनुसार आपल्या सांसारिक जीवनाला सुरूवात करणे महत्वाचे आहे.
न्यायालयात वाढलेली विवाह विवादांची संख्या देखील ‘चिंतनीय’ आहे. ‘डिव्होर्स’ (घटस्फोट) प्रकरणाची कारणे पाहिली तर हसायला येते अशा प्रकारची कारणे आहेत, परंतू विवाह संस्था ही एव्हढी कमजोर नाही. त्यासाठी ‘सप्तपदी’ हा मोठा संस्कार विवाह समारंभात केला जातो. तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध कारणांनी विवाह संस्थेसारख्या मजबूत आणि कौटूंबिक जीवन निर्माण करणार्या संस्थेवर वेगवेगळ्या कारणांनी आघात पोहोचत आहेत. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी संयम, त्याग, संघर्ष याला सामोरे जाण्यासाठी आजच्या मुली तयार नाहीत. शिक्षण आणि करिअर त्यासाठी दोषी ठरते आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तूर्तास एव्हढेच …!