यंदा कर्तव्य आहे
कथा
यंदा कर्तव्य आहे
—————————
“अग सीमा , एखादी चांगली मुलगी असली तर सुचवशील आपल्या रोहितसाठी , यंदा कर्तव्य आहे ग . पण पाहिजे तसं स्थळ काही नजरेसमोर नाही .तुला तर माहित आहेच रोहित किती गुणी व कर्तबगार मुलगा आहे .” ” मला माहित आहे ग प्रतिमा सगळं . पण आजकाल लग्नाच्या मुलींची वानवा भासतेय सगळीकडे . लग्नाची मुले जास्त व मुली कमी . मग या मुलीवालेही जणू सातव्या आसमानावर असतात . अपेक्षा खूप असतात यांची मुलगी जरी सुमार असली तरी . शिक्षण कमी , दिसायला यथातथा असलेल्या मुलींनाही गोरा , गोमटा , राजबिंडा मुलगा हवा . शहरात राहणारा हवा . खेड्यातला नको , डाॅक्टर , इंजिनियर , सरकारी नोकर हवा ., सासू सासरे , दीर नणंदेचा फापट पसारा नको . हवा फक्त राजाराणीचा संसार , हम दो हमारे दो .बाकी मंडळी जाऊ दे हवेत उडत , यांना काही घेणं देणं नसतं .”
” बरोबर आहे ग तुझं म्हणणं . पण माझा रोहितही एकुलता एकच आहे . चांगला M.Sc.Agri .डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरी पण मिळणार होती . पण आमची वडिलोपार्जित भरपूर शेती .

ती कसायची सोडून नोकरी कसा करणार तो . सोन्यासारखी जमीन आमची . नोकरीतील उत्पन्नापेक्षा कितीतरी पट उत्पन्न देणारी , मग हातचं सोडून पळत्याच्या मागे काय लागायचं .राबणारी गडी माणसं , आपली देखरेख .शिवाय रोहित कृषी क्षेत्रातील विद्यानिष्णात , शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बियांणाच्या विविध प्रजाती , खतांची जोड , ठिबक सिंचन , शेतीचं आधुनिकीकरण , मार्केटिंग , शेतीसाठी असणार्या विविध योजना , विम्याचं संरक्षण , शेतमाल साठविण्यासाठी आधुनिक सोयींनी सुसज्ज गोदामं ,त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे .
” होय ग प्रतिमा ,सगळं पटतंय मला .पुढच्या महिन्यात पुण्यात भव्य वधु वर मेळावा आहे . online अर्ज भरायचा आहे. नोंदणी करून ठेव . ” ” होय ,मी घरी गेल्यावर आधी ते काम करते “
” अहो , रोहितच्या लग्नाचा काही विचार करता कि नाही .आता रोहितचं शिक्षणही संपलं , त्याने आपला शेती व्यवसायही सांभाळलाय .आता कसली अडचण . ” अडचण कसली ? आता रोहितनं मनावर घ्यावं ” ” रोहित व्यस्त आहे आपल्या कामात . शिवाय तो मूळातच अबोल , आपला आदर करणारा . तो काय मनावर घेणार , आणि आपलंही काही कर्तव्य आहे कि नाही ? ” ” कर्तव्य आहे ग , आपण कोठे नाकारतोय . पण त्याचंही मत घ्यायला हवं . शिवाय त्याच्या मनात कोणी आहे काय ? हे ही जाणून घ्यायला हवं , तू चिंता नको करूस . मी बोलतो रोहितशी .”
मृगाच्या सरी चांगल्याच कोसळल्या होत्या . तप्त धरतीची तृष्णा शमून ती जणू नवकांतीने उभारली होती . चोहीकडे पसरणारा मृदगंध वातावरणात आल्हाद निर्माण करत होता . दुकानांमध्ये बि बियाणे , खतांच्या खरेदीसाठी शेतकर्यांची झुंबड उडाली होती .रोहितनेही नवीन संकरीत बियाणे घेतली .ज्वारी बरोबरच , उडीद , मूग , चवळी या भरड धान्याबरोबरच तो कांदा व काही प्रमाणात विविध भाज्यांचीही लागवड करणार होता .
रात्री जेवतांना शांतारामरावांनी रोहितला म्हणाले , ” काय रोहित मृगसरी कोसळल्या . सर्वत्र मृदगंध दरवळतोय . आनंदी , आल्हाददायी वातावरण आहे . काळ्या आईच्या सेवेसाठी आपणही सज्ज आहोत . आणि ही काळी आई एका दाण्याच्या बदल्यात हजार दाणे देईल . पण बेटा तुझ्या ह्या आईची पण काही इच्छा आहे . तुझेही दोनाचे चार , पुढे चाराचे सहा व्हावे .” ” बाबा , मी काय सांगणार ? ” ” अरे काय सांगणार म्हणजे ? तुलाच तर सांगावं लागेल ? कोणी आहे
काय तुझ्या पसंतीची ? असेल तर आमचं काम सोपं होईल . फक्त अक्षता टाकण्याचं काम आमचं .” ” नाही बाबा , माझी कोणी पसंती नाही . आईलाच करू देत हे काम ” ” अहो ऐकलंत का ? तुम्ही लागा आता कामाला “. ‘ मी सुरू केलंय माझं काम .पुढच्या महिन्यात वधु वर मेळावा आहे . रोहितचं नाव नोंदवलंय मी . आपण जाऊ तिथे ‘.
दुपारचे जेवण झाले व सगळी मंडळी हाॅलमध्ये परतली . सकाळपासून सुरु झालेल्या वधु वर मेळाव्यात मान्यवरांची भाषणे , सन्मान , प्रास्ताविक , प्रमुख पाहुण्यांचा परिचय यातच सकाळचं सत्र संपलं होतं .आता दुसर्या सत्रात वधु वर परिचय होणार होता . वधुपेक्षा वरांचीच संख्या भरपूर होती . एक एक उमेदवार मंचावर येऊन आपला परिचय देत होता , अपेक्षा सांगत होता .सांगलीची अलका लोणकर व अमरावतीची विद्या बनकर या दोन मुली मला (प्रतिमाला ) रोहितसाठी योग्य वाटल्या . त्यांच्या पालकांशी मी तिथेच संपर्क साधला . गोरा , उंच , राजबिंडा दिसणार्या रोहितला कोण नाकारणार ? मी मनोमन खुश होते .
” रोहित चांगला आहे , उच्च शिक्षित आहे , सधन स्थितीतील आहे ,आम्हांला पसंत आहे , पण मुलाने खेड्यात राहून शेती करण्यापेक्षा शहरात नोकरी करावी एवढी आमची माफक अपेक्षा ” सांगलीच्या अलका लोणकरचे पालक बोलत होते .
‘ आपली गडगंज संपत्ती व शेती सोडून त्याने नोकरी म्हणजे दुसर्यांची चाकरी करायची ? ” ” आमची मुलगी शहरात राहणारी , पुढेही मुलांचे शिक्षण , इंग्रजी शाळा , विविध शैक्षणिक सुविधा शहरातच मिळणार .शिवाय आमची मुलगीही उच्च शिक्षित आहे , ती नोकरी करणारच , तिच्या ज्ञानाचा उपयोग करणार , खेडे गावात हे शक्य तरी होईल काय ?”
आता माझं लक्ष अमरावतीच्या विद्या बनकर वर केंद्रित झालं . ” प्रतिमाताई तुमचा मुलगा चांगला आहे ,उच्च शिक्षित आहे , हुशार आहे , होतकरू आहे . आम्हांलाही असाच मुलगा हवा होता . विद्या आमची एकुलती एक कन्या, माझा बिझनेस , उद्योग व्यवसाय सांभाळायला मला रोहितसारखा मुलगा हवा होता .” रोहितने तुमचा उद्योग व्यवसाय सांभाळायचा आणि त्याचा स्वतःचा कोणी सांभाळायचा ? ” ” ताई शेतीकडे पाहायला तुम्ही दोघं आहात , शिवाय गडी माणसं आहेत . उद्योग व्यवसायात स्वतः लक्ष घालावं लागतं ” ” आम्ही थकलोत आता , पुढील पिढीने ही जवाबदारी सांभाळावी ही आमची अपेक्षा , पण तुम्हांला तर घरजावई हवा “. ते शक्य नाही . विद्याचं स्थळावर मी क्रास मार्क केला .
पुन्हा परिस्थिती जैसे थे वर येऊन ठेपली.
‘ प्रतिमा ,नको चिंता करूस .मिळेल आपल्या रोहितलाही साजेशी मुलगी “
” कशी मिळणार , पाहिलंत ना वधुवर मेळाव्यातही किती कमी मुली होत्या .”
” होय , स्त्री भ्रूण हत्येचा मार्ग अनेकांनी चोखाळला व समाजातील स्त्री पुरूष समतोल ढासळला .हे परिणाम तर होणारच होते . तरी बघूया , रोहित आपला हुशार , होतकरू आहे . त्याला मुलगी मिळेल . नव्हे घरबसल्या सांगून येईल .”
लग्नाचा हा सिजन तर निघून गेला .माझे स्वप्न काही पूर्ण झाले नाही .
” अरे रोहित आलास . मी केव्हाची वाट पाहात होते .आणि सोबत ही कोण ? ” आई ह्यांना घरात तर येऊ दे .या आहेत मीनाक्षी मॅडम , कृषी अधिकारी , कृषी मार्केटिंगसाठी मला बरीच मदत होते यांची .शेतीचं पोत ,आणि इतर घटक लक्षात घेऊन विविध बियाणांचे वाण , खतांचं मागदर्शन करण्यासाठी या स्थानिक सर्व्हे सुद्धा करतात . आज आपल्या जमिनीचा सर्व्हे करुन , मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला देतील व आपल्याला त्यानुसार मार्गदर्शन करतील .” ” होय काय , ठीक आहे . काय घेणार मॅडम , चहा , काॅफी कि थंड बनवू काही ” ” मला मॅडम नाही मीनाक्षी म्हणा आई , तुम्ही मला आईसारख्या आहात .”
किती चांगली मुलगी , मला आई म्हणाली , आंटी नाही , संस्कारी वाटते . रोहितला शोभेशी आहे .
मीनाक्षी आपले काम आटोपून निघून गेली , पण माझ्या मनात घर करून गेली .
‘ रोहित , मीनाक्षी कशी वाटते रे ? काही विचार केलास काय ? ‘ ‘ आई , काय बोलतेस हे ? तू असा विचार कसा करू शकतेस ? माझ्या मनात तसलं काहीही नाही आणि मीनाक्षी मॅडमच्या मनातही नसावं . तू रात्रंदिवस माझ्या लग्नाचा ध्यास घेतला आहेस . कोणत्याही मुलीमध्ये तू आपली सून शोधतेस .” ” तसं नाही रे . मला मुलगी चांगली वाटली . गळ्यात सौभाग्य अलंकार नव्हते म्हणून लग्नाची वाटली . यात माझं काय चुकलं .” ” नाही आई , तसं नव्हतं म्हणायच मला .”
मीनाक्षी कामानिमित्त गावात आली कि मलाहि भेटून जायची . हळूहळू परिचय वाढला .मीनाक्षीला एक धाकटा भाऊ व घरी आई वडील होते . वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर तर आई गृहिणी .निम्नमध्यम वर्गीय कुटुंब .
“मीनाक्षी लग्नाचा काही विचार केलास” .तशी मीनाक्षी निरूत्तर . ” अग , असं मौन राहून कसं चालेल . बरं , मीच घालते विषयाला हात . माझा रोहित कसा वाटतो तुला ? ही माझी , मेलीची इच्छा .तुझ्या मनात नसेल तर विसरुन जा हा माझा प्रश्न . ” ” मी नंतर कळवलं तर चालेल आई ” ” होय , तुला पाहिजे तेवढा वेळ घे “
मीनाक्षीने घरी आई बाबांना रोहितविषयी सांगितलं .” तुला पसंत आहे ना . मग पुढील फाॅर्म्यालिटीज आम्ही करू .रोहितच्या आई बाबांना सांग आम्ही येतो भेटीला म्हणून “
नक्षत्रासारख्या सुनेचं स्वागत करतांना आज मन आनंदानं उचंबळून आलं होतं . ” ये सूनबाई , उंबरठ्यावरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपानं ये ” ” खूप छान आहे हो मुलगी , अगदी लक्ष्मी नारायणाची जोडी शोभतेय .लग्न घरातील सगळ्यांची हिच प्रतिक्रिया होती .यंदा कर्तव्य आहे म्हणत असतांना चार वर्ष भुरsss कन उडून गेली होती
—————————————————
शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई.
मो.9764808391